Talk:Sandeep Khare

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

Catogory[edit]

Sandeep Khare is not a musician but a poet, can be catogorised as Indian poet or Marathi poet —Preceding unsigned comment added by Babban12 (talkcontribs) 19:05, 14 January 2009 (UTC) नेणिवेची अक्षरे* : ऐशी मेळविली[reply]

  • प्रकाशकः काँटिनेंटल प्रकाशन पुणे प्रथमावृत्ती नोव्हेंबर २००८

संदीप खरे ह्या पोरसवदा दिसणार्‍या तरुण कवीला मी पहिल्यांदा ‘जावे कवितांच्या गावा‘ ह्या कार्यक्रमांत पाहिलं /ऐकलं. अरुण म्हात्रे ताज्या दमाच्या कवींचा ताफा घेऊन हा कार्यक्रम सादर करीत असत. त्यात स्वतः अरुण म्हात्रे, अशोक बागवे, अरुण नायगावकर, नलेश पाटील, संदीप खरे इ. कवि सामील होत. गावोगावचे काव्यप्रेमी रसिक तो कार्यक्रम गर्दी करून आवडीने ऐकत. तेंव्हा माझ्या लक्षांत आलं की मराठी कवितेच्या ताटाला किती कसदार आणि भरघोस कणसं फुटतायत! त्या काळांत संदीपच्या ‘मौनांची भाषांतरे‘ ह्या पहिल्या काव्यसंग्रहाने रसिकांचं लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली होती. त्याच्या एकेका कवितेवर ‘मन तळ्यांत-मळ्यांत‘ होताना तरुणाईच्या काळजाचा एकेक ठोका चुकायला लागलेला होता! हळू हळू संदीपचा एक चाहता-वर्ग बनायला लागला. त्यांना कधी कट्ट्यावर बसून मजेत शीळ वाजवणारा तर कधी ‘एवढंच ना, एकटे बसू‘ असं बेपर्वाईनं म्हणत आत्ममग्न होणारा, अशी संदीपची अनेकविध रूपं विलक्षण भावू लागली.

त्यानंतर डॉ.सलील कुलकर्णी आणि संदीप ह्या दुकलीने ‘आयुष्यावर काही‘ बोलायला सुरुवात केली. मुळातच संदीपच्या कवितेत लयकारी, गेयता, प्रसादिकता, नाद-माधुर्य ठासून भरलेलं. त्याला अनुरुप चालींची, ठेक्यांची आणि गाण्याची जोड सलीलने दिली. कोणताही डामडौल किंवा ऑर्केस्ट्राचा लवाजमा नसलेले काव्यगायनाचे कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल‘ जातात; शाळेंतली पाठ्यपुस्तकं सुटल्यानंतर पुन्हा कवितांचं पुस्तक हाती धरलं नव्हतं असं सांगणार्‍या तरुण-तरुणींची तोबा गर्दी उसळते; ह्या कार्यक्रमाला [तिकीट काढून] अर्धशतकी हजेरी लावणारे बहाद्दर निघतात, असले सगळे सुखद चमत्कार ‘आयुष्यावर बोलू काही‘ने घडवले. नुकताच त्याचा ५००वा प्रयोग पुण्यांत दिमाखानं साजरा झाला.

दुसरीकडे चित्रपट-गीतांच्या प्रांतातही पाऊल टाकता क्षणी संदीपने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बहुतेक चित्रपटांच्या पटकथा म्हणजे ‘नव्या बाटलींत जुनीच दारू‘ असा प्रकार असतो.त्यामुळे साहजिकच गाण्यांच्या ‘सिच्युएशन्स‘ही दैनिक राशिभविष्यासारख्या त्याच-तशाच असतात. अशा अवस्थेंत गीतकाराने नावीन्य आणणं आणि संगीतकाराने जान भरणं दोन्हीही अवघडच असतं. पण संदीप-सलील म्हणजे शब्दांचा आणि सुरांचा साक्षात तजेलाच! बघता बघता संदीप आज ह्या क्षेत्रांतही स्थिरावलाय, अवॉर्ड्सची कमाई करतोय आणि तरीही त्याची गीतं कसदार वाटतायत, आपल्या वेगळेपणानं ऊठून दिसतायत.

जाहिरात-क्षेत्रांतला एक यशस्वी ‘कॉपी-रायटर‘ असणार्‍या संदीपकडे फक्त चटकदार शब्दांचा चटपटीतपणाच नाहीय तर समोरच्या माणसाला बघता-बघता आपलंसं करून टाकण्याचा लाघवीपणासुद्धा आहे. एखाद्या गझलकाराला अभिमान वाटावा अशा चमत्कृतीपूर्ण रचना तो अगदी सहजपणे आपल्याकडे भिरकावतो आणि विशेष म्हणजे त्यात कृत्रिमतेचा, खटपटी-लटपटीचा लवलेशही नसतो. उलट ऐकणारा म्हणतो की, ‘ आपल्यालाही अगदी अस्संच काहीतरी वाटलं होतं!‘. म्हणजे वाचकाच्याच खिशांतलं घड्याळ काढून, संदीप त्याला वेळ सांगत असतो! संदीपचा नवा काव्यसंग्रह ‘नेणिवेची अक्षरे‘ त्याच्या काव्यप्रतिभेचे आणखी काही लोभसवाणे पैलू आपल्याला दाखवतो.

अक्षर म्हणजे तरी काय, एक प्रतिमाच, एक चित्र किंवा एक चिन्ह. चिनी भाषेनं चित्रांचीच लिपी बनवली, जी अजूनही वापरात आहे. आपण ‘क-कमळांतला, प-पतंगातला‘ अशी घोकंपट्टी करून, एकेका अक्षराची ‘आयडी‘ पक्की करत जातो.सा र्वत्रिक मान्यतेचं शिक्का-मोर्तब झालेल्या या प्रतिमाच पुढे लिपीतली मुळाक्षरं बनतात. मग त्या लाकडी ठोकळ्यांसारख्या मुळाक्षरांना उभे-आडवे, तिरके, पुढे-मागे कानामात्रांचे संस्कार करून आपण एकापुढे एक मांडत ‘शब्द‘ बनवतो. त्या मुळाक्षरांचे आणि शब्दांचे मग प्रचलीत उच्चार होऊ लागतात. त्यांचा वापर करून आपण एकमेकांशी बोलू-लिहू-वाचू लगतो. ही झाली जाणिवेच्या स्तरावरची अक्षरं. नेणिवेची अक्षरं कशी असतील?

प्रतिभेचा प्रवास म्हणजे चेतन किंवा जाणिवेच्या स्तरावरून निश्चेतन किंवा नेणिवेच्या स्तराकडे मारलेल्या सुळकांड्याच म्हणाव्या लागतील. तिथे अबोध, अमूर्त, गूढ असं खूप काहीतरी आहे, त्याचा ठाव घेण्याच्या कुतुहूलानं आणि जबरदस्त ओढीनं हा प्रवास सुरू होतो. नेणिवेची एकेक अक्षरं हाती गवसू लागतात आणि जलाशयाच्या तळाकडून पृष्ठभागाकडे धाव घेणार्‍या बुडबुड्यांप्रमणे कवि-कल्पना जाणिवेच्या स्तरावर शब्दांचं रूप धारण करून दृगोच्चर व्हायला लागतात. शोधाची आणि आविष्काराची ही सर्जनशील प्रक्रिया प्रतिभावान आणि चिंतनशील कवीच्या अंतर्मनात चाललेली असते. त्यातूनच ‘नेणिवेची अक्षरं‘ जाणिवेच्या अक्षरांत आणि शब्दांत प्रकटतात.

ही प्रक्रिया म्हणजे रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेंतल्या पूर्वनियोजित प्रयोगांतल्या क्रिया-प्रतिक्रियांसारखी नसते. ती इतकी ‘अनप्रेडिक्टेबल‘ असते की खुद्द कवीलाही तीचा थांगपत्ता जाणिवेच्या पातळीवर नसतो. म्हणूनच संदीप म्हणतो, “कवितेची एक ओळ लिहून होते तेंव्हा पुढची ओळ कशी येणार आहे, हे मलाही माहीत नसतं.”

हा शोध, हा प्रवास एकट्याचाच असतो. ती वाट एकट्यानेच चालायची असते. ‘कोणीही नसतं‘ ह्या कवितेत संदीपनंच म्हटल्याप्रमाणे, ‘वाटभर दूर दूर मृगजळांचे महापूर कुणीही नसतं, आपण एखादा महापूर झेलतो तेंव्हा‘

मानवी आस्तित्वाचा अर्थ आणि प्रयोजन तलास करणारा हा प्रवास असंख्य प्रतिभावंतांनी, असंख्य वर्षं, अनेकदा केलाय. त्यातून त्यांच्या हाती जे लागलं ते आपल्यापुढे मांडताना आपल्याला बजावून, बजावून सांगीतलंय की ‘हे अंतिम सत्य नव्हे, हा अखेरचा शब्द नव्हे‘. तरी सुद्धा ती सतातन रहस्यं खुणावतच रहातात, नवे प्रवास सुरूच रहातात. जुनी उत्तरं पुनःपुन्हा घासून-पुसून नव्यानं तपासून पहाण्याचा चळ काही केल्या सुटत नाही. ह्या अवस्थेचं वर्णन करताना संदीप म्हणतो, ” मी पात्यापात्यावरती पृथ्वीला वाचत आहे आत्म्याचे शोधत गाणे अनिवार भटकतो आहे. आज जळाहून उघडा मी अन वार्‍याहून अनवाणी ‘ [झरझरते नभ घागर]

या अनिवार भटकंतीत. कुठेतरी एखाद्या वळणावर पावलं थबकतात. तिथं कुठलातरी ‘वाद‘, कुठलातरी ‘इझम‘ अशीं एखादी पाटी लटकत असते. संदीपही अशा कित्येक थांब्यांवर रेंगाळला आहे.

” कुणाला तरी वाटले, वंशाला दिवा हवा… कुणाला तरी वाटले, घरांत पाळणा हवा म्हणून आम्ही जन्मा आलो…. कारण नव्हते काहीच पण घडायचे होते घडणार नव्हते काहीच पण थांबायचे होते काहीतरी व्हायचे नव्हते पण काहीतरी व्हायचे होते म्हणून आम्ही जन्मा आलो.” [म्हणून] अशी आस्तित्ववादी [existantialist] भूमिका संदीप कधी मांडतो तर कधी त्याच्या ‘प्रवास‘ सारख्या कवितेत ‘झेन बुद्धिझम‘ डोकावतो. ” सारे म्हणतायत की मी प्रवास वगैरे करतो आहे / ……… / पण मी तर फक्त बसलो आहे” [प्रवास]

तोच संदीप जेंव्हा म्हणतो, ” इच्छा मेली ….. बरेच झाले. सुटली तीही अन आपणही. खत्रूडच होती तिची कुंडली पहिल्यापासून सदा मिळाले धक्के, खस्ता आणि नफरत असायची पण, उद्याकडे ती डोळे लावून

इच्छा मेली ….. आता तिजला स्वप्न असे नाव देवूनी छान मिळाली भिंतीवरती चंदन चौकट नित्य अता हा धूपही जाळतो..पूजा होते. हार खाऊनी मरता बसली हार पांघरून.“ तेंव्हा तो वैफल्यग्रस्त होऊन, नियतीपुढे गुढघे टेकलेला वाटतो परंतु तेच, तो जेंव्हा म्हणतो,

“समजत का नाही मला? तरी तेच स्वतःच व्हायचे पाय्..स्वतःच ठेच असे जरी असले तरी तसेच असत नाही काळ काही पत्ते खेळत जागीच बसत नाही.” [चिवट] किंवा

” कुठलेही हरणे किंवा जिंकणे हे क्षणिक असते हे समजल्यावर सुद्धा टिकून रहते का झुंजायची रग ? [कुठे]

तेंव्हा तो वास्तववादी पण सकारा॑त्मक वाटतो. ‘ही कागदाची होडी‘ सारख्या कवितेत तर त्याचा होकारात्मक भाव आणखीनच ठसठशीत होतो.

‘जाब‘ कवितेत संदीप ईश्वरालाच काही रोखठोक सवाल पुसताना, खरं तर, ईश्वराच्या आस्तित्वाबद्दलच शंका प्रदर्शित करतो. तर,त्याच्या ‘कुणी अभंग म्हणता‘ ह्या कवितेत “मी देव हरवला कधीच माझ्यामधला ती जुनी कहाणी पुन्हा नव्याने स्मरते “[कुणी अभंग म्हणताना] ईश्वर ह्या संकल्पनेवरची आपली निष्ठा उडून गेली याची खंत जाणवते.

याचा अर्थ, ‘पोएटिक इफेक्ट‘साठी संदीप आपला ‘फिलॉसोफिकल स्टान्स‘ सारखा बदलत राहतो, असा घायचा का? कां असं समजायचं की तो ज्या थांब्यावर किंचितकाळ विसावला, त्या थांब्यांचे फोटो तो प्रामाणिकपणे टिपत जातो? जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांनी गमतीने म्हटलं आहे, ” Consistency is a virtue of an ***”. त्यातला गमतीचा भाग सोडून दिला तरी, E.M.W. Tillyrad यांनीही काव्याच्या संदर्भात, तसाच जो विचार मांडला आहे, ” The real subject of a poem is the state of the author’s mind at the time of composition.” तो संदीपच्या बाबतीत खरा वाटू लागतो.

‘स्व‘कडे सूक्ष्मपणे पहायला लागल्यावर होणारं ‘स्व-दर्शन‘ कित्येकदा वेगळंच. ‘खरं‘ आणि धक्कादायक असतं असा विचार अनेकदा संदीप प्रांजळपणे व्यक्त करतो. उदा.

“शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती! हरवलो तेंव्हाच कोठे सापडाया लागलो! काय हे आयुष्य माझे! काय ही थट्टा तरी? मी मला सोडून सर्वां आवडाया लागलो!” [आज मी आयुष्य माझे] किंवा “रडता रडता मग आरशापुढे जातो पाहतो माझेच सोंग आणि खूप हसून घेतो.” [चिवट] किंवा “मी मला दिसलो असा की न जसा दिसलो कुणा कुरुपतेचा आळ कायम आरशावर ठेवला” [दाढी काढून पाहिला] किंवा “ठाऊक मज मी ऐसा तरिही खुशाल फिरतो मीही आहे ‘ईश्वर-निर्मित‘ इतुके म्हणतो” [मी] किंवा “अंधारातील संपले सुख आणि प्रकाश भेटत नाही आपणास आपण दिसू येणे याहून मोठी शिक्षा नाही.” [क्षणभर खच नक्षत्रांचा] किंवा “तसे काही चेहर्‍यावरती अधिक-उणे नसते पण मनांत दु:खी असणार्‍यांचे हसणे वेगळे दिसते” [प्रेम नाही]

अशा किती तरी प्रकारांनी संदीप वाचकाला ‘स्व-दर्शन‘ घ्यायला उद्युक्त करतो आणि ह्या प्रयत्नांत काही भलतं-सलतंच दिसायला लागेल असा धोक्याचा इशाराही देऊन ठेवतो.

“मरणाशिवाय कळणे जगणे अवघड / अन जगण्याशिवाय मरणे“[ वाया] असे सांगत संदीप,या संग्रहांतल्या कित्येक कवितांमध्ये, जीवनाचा प्रवास संपत आल्याची जाणीव होणार्‍या मुशाफिर्‍याची मानसिकता अनेक प्रकारे व्यक्त करतो.

” वृद्धत्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत वेळी भेटू…. आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेंव्हा गाठू! सुकले तरीही गंधित ते क्षण संध्येच्या परडीतून वेचू! कसली भीती सरता यौवन? भरता सागर? सरता हेतू! जन्म सांगतो, एका जन्मी जळून घेऊन विझून घे तू..” [ कातरवेळ] असं वियोगित प्रेयसीला उद्देशून म्हटलं आहे की स्वतःच्या काव्य-प्रतिभेलाच? “पहा लकाके नभात शेवटला रंग! कोण जाणे कोण्या क्षणी सारे सोडून जायचे!” [आता उरले ना दिस] किंवा “एकच क्षण प्रकाशाचा, अंधार तोही वेढून घेईल तळघरांत हुरहुरीचे एक पैण्जण वाजत राहील….” [क्षणभर खच नक्षत्रांचा] किंवा “पैल निघावे वाटे, ठेवून ऐलतटावर देणी” [झरझरते नभघागर]

अशा अनेक ठिकाणी संदीप मृत्युनामे ‘अंतिम सत्या‘चा विचार करतो, वाचकालाही करायला भाग पाडतो. खुद्द मृत्युशीच तो ‘निर्गम‘ कवितेंत रोखठोक भाषेंत संवाद साधू पहातो, तेंव्हा नकळत तोंडातून दाद निघून जाते.

या संग्रहांतल्या प्रेमकवितांनाही खास ‘संदीप-टच‘ आहे. कित्येक कविता म्हणजे ‘गझलनुमा नग्मे‘ वाटतात. “उभा आहे मस्त खुशाल थंडीच झालेय माझी शाल गुलाब तिच्या गालांवर! कसा निघेल इथून पाय! वेड लागेल नाही तर काय! [कसा चन्द्र.. कसं वय] किंवा “गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना नाव माझे टाकताना तू उसासा एक टाक ना! ऐल देशी, शुष्क रानी पण्ख मिटला मोर मी पैल देशांतून थोडे पावसाळे धाड ना!!” [काय ती करते खुणा] किंवा “कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही कसे सुचले मला गाणे तिला हे उमगले नाही” [तिला मी बघितले] किंवा “इथे हीच जागा, अशी हीच वेळा क्षणांची अशी हीच होती गती तुझ्याविण आता इथे हिंडताना किती एकटा मी तुझ्यासोबती” [किती एकटा मी] अशा कितीतरी चमकदार, मनोहारी प्रतिमा आणि कल्पनांनी संदीप प्रीत-भावनेची नानाविध रुपडी नटवतो. विरहाची आणि वियोगाची दुख्खंसुद्धा त्याच्या कवितेंत शालीन आणि समंजस वाटतात!

‘हसा बाई हसा‘ ही या संग्रहांतली आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कविता,. खास संदीप-धाटणींतली! म्हटलं तर हे बाल-गीत किंवा बडबड-गीत आहे पण जाता-जाता संदीप अलगदपणे आणि मिस्कीलपणे या कवितेंतही ‘आयुष्यावर काही‘ खु्सखुशीत कॉमेंटस मारून जातो. ‘उत्कट-बित्कट‘ किंवा ‘बधीरतेचे श्लोष्क‘ यासारख्या कवितेंतली वक्रोक्तीसुद्धा धारदार आणि प्रतिभाशाली आहे.

‘नेणिवेची अक्षरे‘ मधल्या कवितांचा आस्वाद, घोटा-घोटाने, हळू-हळू घ्यावा लागतो. या कवितांमधे जितकं खोल शिरावं तसतशी त्यांची लज्जत वाढत जाते. संदीपच्या कविता ‘दुर्बोध‘ नक्कीच नाहीत पण विचार करू गेल्यास अर्थांच्या इतक्या नव्या छटा समोर झुलायला लागतात की कधी कधी वाचकाला वाटायला लागतं, ‘खरंच, ही कविता पहिल्यांदा वाचली होती तेंव्हा आपल्याला उलगडली होती का?’ हीच संदीपच्या प्रतिभेची ऊंची आणि खोली आहे. ” हा प्याला, ही मदिराही नश्वर आहे हे काळ्या दगडावरचे अक्षर आहे! वाटते तरी का असल्या मदिरवेळी पेल्यांतून माझ्या पितो ईश्वर आहे!!” [साकीचे घर]

असा एक वेगळाच ‘माहोल‘ संदीप उभा करतो. आपण त्यांत बुडून जायचं, घोटा-घोटाने त्याच्या काव्य-मदिरेची चव चाखायची.

-बापू करंदीकर —Preceding unsigned comment added by Pkarandikar50 (talkcontribs) 04:23, 22 July 2009 (UTC)[reply]

This section is nice one but i think this is not the place for this content! What others feel about it? Should we delete this content? Abhijeet Safai (talk) 07:51, 6 April 2012 (UTC)[reply]